Sunday, 23 October 2016

Narendra maske

शेतकरी जगला तर देश टिकेल....
     बळीराजा सुखी तर देश सुखी अर्थात शेतकरी जगला तर देश टिकेल.भारत हा कृषीप्रधान देश आहे,शेती हा मुख्य व्यवसाय व येथील शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक म्हणजेच पाठीचा कणा.
तृष्णा भागविण्या या धरणीची
वरुणराजा जेव्हा येई बरसुनी
तव घामाऐवजी मातीत रक्त सांडुनी
बळीराजा राबतो शेतात रात्रंदिनी
पिकवुन मग मातीत मोती
जोडतो भाकरीचे मानवाशी नाती
   भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु या देशातील जगाचा पोशिंदा निसर्गाच्या फेर्‍यात अडकुन आर्थिक विवंचनेत दिसतो.कधी दुष्काळ , कधी महापूर तर कधी गारपिटीचा तडाखा यामुळे तोंडाशी आलेला घास नकळत दुर जातांना भावी स्वप्न सत्यात उतरण्यापुर्वीच पाण्यात वाहतांना बघण्याशिवाय पर्याय नसतो.भारनियमन, पाण्याची कमतरता, शेतीमालाला मिळणारा अल्पभाव आदी समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या, एकुणचअतीकष्टाला फळ मिळत नाही.प्रत्येकाला आपला मोबदला मिळायला हवापरंतु त्याच्या मेहनतीचा लाभ दुसराच उचलत असतो हा त्याच्यावर झालेला अन्यायच म्हटला पाहीजे.
शेतकरी रात्रंदिनी शेतात घाम गाळे
मालास परि त्याच्या भाव न मिळे
तरी सर्व त्यास छळे
मज हे न कळे
जगाचा पोशिंदा सुखी तर जग सुखी परंतु आज सर्वच वस्तु महाग होतांना शेतकर्‍यांचा मालाला मग तो कपाशी , कांदा असो व सारा माल पाहीजे तेव्हढा भाव मिळत नाही यासाठी शासनाने जास्तीत जास्त भावात हा माल खरेदी केला पाहीजे.
   बोगस बियाणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जीवनाशी खेळला जाणारा जीवघेणा खेळच ,जे मिळणार्‍या पैशांनी भावी आयुष्याचे स्वप्न पाहतो तेच या बोगस बियाण्यांद्वारे नष्ट होते.बियाणे असो वा खते नेहमीच फसवणुक होतांना दिसते ज्यासाठी अक्षरशः रांगेत ताटकळत ऊभे रहावे लागते व हाती मिळते ते बोगस बियाणे व ढासळलेली गुणवत्ता असलेली खते त्यानंतर शेतीमाल बाजारपेठेत आल्यानंतर नशिबी येतो तो तुटपुंजा पेसा व निराशा, अशा दोन पाट्यात शेतकरी भरडला जातो.
   पूर्वी " बचेंगे तो लढेंगे " असे म्हटले जायचे परंतु आता "लढेंगे तो बचेंगे " असे म्हणण्याची वेळ आली आहे .असे असतांना जीवनात आलेल्या या संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यातच यश दडले आहे व अनुभवाच्या दारातुन जातांना खचुन न जाता जीवनातील हा लढा आपल्याला "जगणे" शिकवितो हे बळीराजाने विसरता कामा नये .
   रक्ताचे पाणी करुन मानवाचे भाकरीशी नातं जोडणारा बळीराजा जे कधी आपले स्वप्न पाण्यात वाहतांना पाहतो तर कधी दुष्काळाच्या झळांमध्ये पाकांसोबत कोमेजुन जातात यासाठी बळीराजाने आधुनिक शेतीकडे वळायला हवे, विविध सेंद्रिय खतांचा वापर, पोषकद्रव्ये , किटकनाशके यांच्या वापराविषयी त्याचप्रमाणे शेतीतील मातीचा सामू , घटकद्रव्यांचे प्रमाण , स्तर याविषयी जागरुकता व ज्ञान जाणुन घेतली पाहीजे. पिकांचे नियोजन व बाजारपेठांविषयी माहीती करायला हवी. त्यासोबतच शासनाने वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावुन नुकसान भरपाई वेळेत द्यायला हवी तसेच विनाव्याज कर्जाची सोय ,बियाणे वखतांची उपलब्धता ती सुद्धा गुणवत्तापूर्वक असावी.संकटातुन "ऊभे " राहण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत केली पाहीजे.
    अन्नधान्य शेतीपासुन आपल्या पर्यंत पोहचायला लागणारा कालावधी , लागणारे श्रम , लागणारा पैसा यांचे महत्त्व बळीराजाच्या डोळ्यात बघा.पोशिंद्याला वेठीस धरण्याचा धंदा जोपर्यंत बंद होत नाही तो पर्यंत "कृषीप्रधान "देशात शेतकरी आत्महत्येला आळा बसणार नाही व देशाच्या प्रगतीला खीळ बसत राहणार व पोशिंद्याला वेठीस धरणे म्हणजे धान्याला , अन्नाला आपल्यापासुन दूर करण्यासारखे आहे  हे सर्वांना कळायला हवे शेवटी "शेतकरी जगला तर देश टिकेल ".
नरेंद्र शामराव म्हस्के ,
शिरपूर ( धुळे )
मो. न. ९५५२९८००८९
    @ ६५

No comments:

Post a Comment